फॉलोअर

शनिवार, ७ जुलै, २०१२

गुगलवर  सर्च मारत मी एकटाच बसलो होतो ..
जग जवळ मानून 'व्हर्चुअल' जगाला फसलो होतो..

माहितीच्या जळमटात एकेका धाग्याने गुंतत होतो..
इथे हवं ते मिळतं असं मुकाट मानून बसलो होतो.. 

आवाज होत होता तो फक्त क्लिक आणि टकटकचा...
तिथूनच कुणीतरी साद देईल अशा वेड्या आशेचा 
कुणीतरी कानाशी कुजबुजले..

गुगल अर्थ वर म्हणे जग दिसते..

एका क्लिक वर दिसतात तिथे पृथ्वी, देश आणि पुणे 
एकही माणूस दिसत नाही एवढेच काय ते उणे !!

गुगलच्या जगावर दिसत होते माझ्या घराचे अंगण 
पण शोधूनही सापडले नाही तिथलेच तुळशी वृंदावन

गुगल अर्थ च्या दुर्बिणीतून सारी धरती दिसली..
सगळं सोबत असूनही कळेना अनामिक ओढ कसली..!!


कुमार माधवन 





सोमवार, ११ जून, २०१२

अरे अशी कुठे असते का शाळा.. ???


तुला शाळेत घालायचे याची तयारी आम्ही किती दिवसांपासून करतोय..
तू शाळेत पहिलं पाऊल टाकणार हा आमच्यासाठी किती आनंदाचा क्षण..
कालपर्यंत तू घर भर आनंदाचे माणिकमोती पसरत होतास 
आता जगाच्या आकाशाखाली पहिल्यांदा उभं राहून स्वतासाठी पहिलं पाऊल टाकणार..

किती आवडीने सगळी तयारी करत होतो रे  
तुझ्यासाठी तुला आवडेल असं छानस छोटं दप्तर आणलं.. 
तुझ्या चीमुल्कल्या बोटात  मावतील  असे  रंगीत खडू आणले..
तुझा शाळेचा ड्रेस आणला... तुझ्या आईने तुझ्या सार्या वह्या-पुस्तकांना कव्हर घातली.. 
तुझ्या दप्तरावर आणि तुझ्या ओळखपत्रावर तुझा छोटुसा फोटो लावताना किती छान वाटत होत..
तू शाळेच्या पहिल्या दिवशी घाबरू नयेस.. रडू नयेस.. म्हणून किती धडपड.. 
रोज गाडीवर बाहेर पडल्यावर तुला तू ज्या शाळेत जाणार ती शाळा दाखवत होतो..
भिंतीवर रंगवलेले जिराफ आणि फुलं दाखवून तुझ्या मनात शाळेची गोडी निर्माण करायचा प्रयत्न करत होतो..
शाळेत गेलं कि रडायचं नाही हे तुझ्या कोवळ्या मनाला सारखं बजावत होतो...
शाळेत इतर मुलं रडली तर त्यांना तूच समजवायचं असं मोठेपणहि कारण नसताना लादत होतो..

तू पण म्हणालास...
''मी शान्गेन बाबा शगल्याना.... ललू नका.. मी आहे न.. मी गाने म्हनून दाखवेन ना...''
इतके गोड वाटत होते तुझे बोल...

आणि शाळेचा तो पहिला दिवस उगवला.. 
तुला छान तयार केलं.. शाळेचा घडी न मोडलेला ड्रेस तुला घातला..
तुही सारे कसे मजेने करत होतास.. 
हसत होतास..
शाळेच्या दारात पोचलो.. आणि अगणित चिमुकल्यांचा एकच रडण्याचा आवाज कानावर आदळला..
तुझी माझ्या मानेभोवाताल्ची मिठी नकळत घट्ट झाली..!! 
तुला मला सोडायच नव्हतं 
आणि मला, 'हसत हसत' तू शाळेत जाताना पाहायचं होतं... 

गेट मधून आत आलो आणि वर्गा वर्गात मुलं नुसती कोंबली जात होती.. 
आई वडिलांच्या हातातून घेऊन त्यांना आत घेतल्या घेतल्या दार लावलं जात होतं.
आतून फक्त हमसून हमसून रडण्याचा आवाज...!!!

तुला मी पण तसंच सोडणार होतो रे .. 
मला तसं सोडायचं नव्हतं तरीही.. 
मी तुला दोन मजले चढून एका वरच्या खोलीत घेऊन गेलो..
तिथून पण असाच नुसता आक्रोश ऐकू येत होता..
रडू नको हा असं तुझ्या आणि नकळत माझ्या मनालाहि समजावत मी वर्गापर्यंत आलो..
आतून कडी लावलेली होती...
मी दार जोरात वाजवल..
किलकिलं होत दार उघडलं... 
भसकन एखादा आगीचा लोळ यावा तसा चिमुरड्यांच्या प्रचंड रडण्याचा आवाज कानावर आदळला..
मी काही बोलणार इतक्यात आतून दोन हात आले आणि चेहराही नीट दिसू न देता माझ्या मुलाला आत घेऊन गेले..
मी सुन्न...!!!
दार बंद होताना त्या निरागस मनाची एक ओझरती दृष्टीभेट झाली.. त्याच्या डोळ्यात क्षणात किती पाणी तरळले होते..
असहाय्यता, हतबलता, भीती, कारुण्य.. आणि कितीतरी खोल होते त्या दोन चिमुकल्या डोळ्यात.. 
माझा श्वास अडकला... मी त्या नजरेला नजर देऊ शकलो नाही.. 
एका क्षणाच्या अंतरात दरवाजा बंद झाला... 
मी काही क्षण तिथेच दरवाजाबाहेर उभा..
रडणाऱ्या त्या कोवळ्या जीवांमध्ये मी माझ्या पिल्लालाही सोडून आलो होतो..
त्या कोलाहलात आता मी माझ्या चिमुकल्याचा आवाज ऐकू पाहत होतो.. 
बंद दरवाजे.. बंद खिडक्या आणि तिथल्या बंद मनांना चिरून हजारो रडणारे आवाज माझ्या कानावर आदळत होते..
आता ते सारे आवाज मला माझ्याच पिल्लाचे वाटत होते...

मी यांत्रिकपणे पायर्या उतरून खाली आलो.. अजून मुलांचे रडणे काही थांबत नव्हते.. 
मुलांसाठी शाळेत बरेच फुगे लावले होते.. दारासमोर रांगोळी काढली होती..
पण मला ते सारे रंग केविलवाणे आणि कृत्रिम वाटत होते..
कारण निरागसपण आतून धाय मोकलून रडत होते...!!!

तीन दिवस रडतात पोर.. नंतर रुळतात...
तोंडातून लाल रस बाहेर काढत गेट बंद करताना कुणीतरी म्हणाला..
साडेदहा शिवाय येऊ नका असं आई बापाला हाकलत तो निवांत गप्पा मारत बसला..
मुलांचे रडण्याचे आवाज त्याला नित्याचे असावेत.. 
रस्त्यावरून धावणाऱ्या असंख्य गाड्याचे आवाज कुणी लक्ष देऊन ऐकतो का.. तसेच हे रडणे कि..
अर्धा तास होत आला मी अजून गेट बाहेरच उभा.. 

मी का सोडलं मुलाला शाळेत..??
त्याच आनंदाचं जग असं हिरावून काही क्षण तरी त्या कोंडवाड्यात डांबण्याचा अधिकार मला कुणी दिला.. ??
किती स्वप्नं दाखवली त्याला आणि फसवून कुठ सोडून आलो त्याला..?? 
त्या कोलाहलात किती भांबावून गेला असेल बिच्चारा...
कंठ दाटून आलेला...
अरे अशी कुठे असते का शाळा.. ??? न राहवून मी बोललो.. आवाज पण कातर झालेला..

माझ्या पिल्लाचे आजी-आजोबा किती कौतुकाने आले होते शाळेत...
दोघांचे पाय दुखत असूनही...
वेळेत पोचले नाहीत म्हणून त्यांना त्याला वर्गात जाताना पाहता आले नाही..
त्यांनी नाही पहिले ते बरेच झाले.. नाही तरी होते काय पाहण्यासारखे त्यात..!! 

खालच्या वर्गातील एक खिडकी अचानक उघडली.. 
अश्रुनी डबडबलेले दोन डोळे आणि मदतीसाठी बाहेर आलेले दोन हात मला दिसले.. 
क्षणात खिडकी बंद झाली आणि खिडकीचा पडदाहि बंद झाला..
हे काय होते.. किती भयानक.. किती अमानुष..??
खरच अशी असते का हो कुठे शाळा..?

घड्याळाचा कसोटी पाहणारा काटा अखेर साडेदहा वर पोचला..
मग शाळा सोडायची का याची परवानगी घ्यायला शिपाई गेला..
करकरत पुन्हा गेट उघडले आणि इतका वेळ रोखून धरलेली मने त्या निरागस जिवाकडे धावली.. 

मी पुन्हा दरवाजासमोर उभा...  गेलेला दीड तास डोळ्यासमोरून गेला..
रडणारा तो चिमुकला चेहरा आठवला.. 
दरवाजा बंद होतानाचे त्याचे भरून आलेले डोळे आठवले.. 
दरवाजा उघडला पण एकदम सगळ्यांना सोडेनात..
दरवाजाच्या कोपर्यात उभा राहून पाहणाऱ्या पिल्लाला अखेर मी दिसलो.. 
माझ्याजवळ यायची तो केविलवाणी धडपड तो करत होता.. 
अखेर मी त्याच्या जवळ गेलो त्याला उचलून घेतला.. 
पुन्हा त्याच बांध फुटला.. मानेवर डोकं ठेऊन रडत राहिला.. 
त्याच्या अश्रुनी मी पुरता भिजून गेलो..  पार आतूनही...!!!

संपली रे बाळा, शाळा.. असं समजावत त्याला बाहेर आणलं
आईच्या जवळ गेला आणि पुन्हा त्याला रडूच फुटलं...
खिशात कोंबलेला एक बिस्किटचा पुडा होता पण त्याला हातही लावलेला दिसत नव्हता...
शाळा आवडली का रे.. ?? माझा एक फालतू प्रश्न... 
''नाही आवडली..'' अपेक्षित उत्तर..

हळू हळू शांत झाल्यावर तो मला म्हणाला..
बाबा, तू मला आत सोडून दार का लावून घेतलं??
मी खूप रडलो.. तुला शोधात होतो मी..
मला अक्षरशा भडभडून आलं..
मी त्याला जवळ घेऊन म्हटलं
मी नाही रे लावलं दार.. ते चुकून लागलं.. मी बाहेरच उभा होतो.. दार दुरुस्त केलं आणि मग उघडलं..
तो म्हणाला... बाबा असं जाऊ नको रे मला सोडून..!!
माझ्याकडे उत्तर नव्हतं...
मी त्याला जवळ घेतला.. पाठीवर झोपवून थोपटलं...
रडून रडून थकलेला तो जीव शांतपणे, विश्वासाने पडून राहिला होता..

शाळेचा पहिला दिवस खरच असं असावा..?
किती स्वप्नं दाखवली होती मी आणि किती भ्रमनिरास झाला असेल त्याचा...

माझ्या हातातून अचानक अनोळखी हातात जाताना तो किती बावरला असेल?
खोलीत सारे अनोळखी जग पाहताना किती वेळा काळजाचा ठोका चुकला असेल?
आई  बाबाला सोडून  पहिल्यांदा  बंद खोलीत ते सारे रडणे अनुभवताना मनात किती बावरला असेल?
चटकन जाऊन बिलगावे अशी जागाच न सापडल्याने किती सैर भैर झाला असेल?..
आतल्या खोलीत कितीही मोठ्या आवाजात कार्टून लावले म्हणून काय त्याचे लक्ष वेधू शकले असेल?
अजिबात नाही...
मग या कोवळ्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस खरच कधी आनंददायी करता येणार नाही का आपल्याला.??
मुलं हळू हळू रुळतात हे मान्य पण ती जुळवून घेतात.. आपण म्हणतो रमली पोर..
पण इतक्या लहान वयात हि अशीच सुरवात करायला हवी?? दुसरे काहीच पर्याय नाहीत? कि आपल्याला याचा विचार करावासाच वाटत नाही इतके आपण असंवेदनशील बनत चाललो आहोत?..

चार भिंतीतून पहिल्यांदा त्यांना बाहेर काढायला हवे..
सहवास, नवी माणसे छान असतात हे त्यांना उमगू द्यावे..
मुलं मुलामध्ये रमतील ना, पण अशी दारं खिडक्या लावून नको..
निसर्गा च्या सोबतीने वर्ग सुरु नाही का करता येणार?
अनोळखी हातात एकदम जाताना ते हात ओळखीचे करून मग नाही का देता येणार? 

खूप नाही बदलावे लागणार.. फक्त थोडी संवेदनशीलता जागवावी लागेल.
चिमुकल्यांच्या मनात शिरून त्यांना काय हवं ते जरा समजून घ्यावं लागेल..

या घडीला मात्र... मी आणि माझ्या पिल्लामधील ती दृश्य-अदृश्य भिंत अजूनही तशीच आहे..
अन डबडबलेल्या डोळ्यांनी तो मला विचारतोय...
बाबा, तू दार का लावलं रे..??
मला नको असं सोडून जाऊ.....!!!!



शुक्रवार, १ जून, २०१२

कोवळे किरण आशेचे...!!!

आयुष्यात काही  क्षण अगदी सहज घडून जातात पण खूप काही सांगून जातात.. मनाला एक दिलासा देऊन जातात.. एक नवा आशावाद जागवतात..

एका प्रकल्पाच्या कामासाठी काही पुस्तकांचे संदर्भ हवे होते.. ग्रंथपाल प्रसाद भडसावळे हा मदतीसाठी कायम तत्पर असणारा माणूस.. ते म्हणाले, मी ज्या शाळेत सकाळी असतो तिथे आलात तर तुम्हाला हवी ती पुस्तके व हवे ते संदर्भ घेऊन जा.. सकाळी १० वाजता मी आबासाहेब अत्रे दिन प्रशालेमध्ये पोचलो.. बाहेरचं धावता जग आणि शाळेत शिरल्यापासून जाणवणारं जग खूप वेगळं होतं त्याहून जेव्हा मी ग्रंथालयात गेलो तेव्हा तिथले वातावरण मला खूप भावले.. विषयानुसार, व्यक्तीनुसार पुस्तके कपाटात व्यवस्थित लावलेली होती.. काही हजार पुस्तके, सर्व प्रमुख संदर्भ ग्रंथ या शाळेच्या ग्रंथालयात पाहायला मिळतील असे बाहेरून वाटणार पण नाही.. पण मला तिथे भावलेली गोष्ट खूप वेगळी होती.. कारण सकाळपासूनच ग्रंथालयात मुलांची वर्दळ होती.. कुणी वर्तमानपत्र वाचण्यात गढले होते तर कुणी अगदी प्रामाणिकपणे कात्रणे काढून त्या त्या विषयाची वही चिकटवून तयार करत होते.. अनेक जण पुस्तके वाचण्यामध्ये मग्न झालेली दिसत होती.. ते वातावरण कुणालाही पाहून छान वाटावे असेच होते.. मला हवी असणारी संदर्भाची पुस्तके भडसावळे यांनी काढून दिली. एका पुस्तकाचे काही संदर्भ घेण्यासाठी मला त्याच्या xerox  हव्या होत्या... माझा वेळ वाचवा म्हणून त्यांनी एका चुणचुणीत मुलाला आवाज दिला.. पुस्तकाची जेवढी पाने हवी होती ते क्रमांक मी त्याला लिहून दिले. त्यासाठी दहा रुपयांची एक नोट त्याच्याकडे दिली.. तो गेला. पंधरा मिनिटात परत आला. मला हवी असलेली पाने त्याने हातात दिली.. भडसावळे यांचे आभार मानून मी ऑफिसला परत आलो.. एव्हाना सकाळचे बारीक सारीक तपशील मी केव्हाच विसरून गेलो होतो..
...................................................................................................................................................................
संध्याकाळी मला भडसावळे पुन्हा दिसले.. त्यांनी मला हाक मारून थांबवले आणि माझ्या हातात २ रुपयांचे नाणे ठेवले.. म्हणाले.. सकाळी तो मुलगा xerox काढायला गेला होता. तुम्ही गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि आपण उरलेले पैसे दिले नाहीत. तेव्हा त्याने ते पैसे माझ्याकडे दिले आणि म्हणाला सरांना हे पैसे आठवणीने द्या नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा...''
दोन मिनिटे मला ते पैसे घ्यावे कि न घ्यावे हे सुचेना. पण नंतर मला त्या मुलाच्या वृत्तीचे खूप कौतुक वाटले.. मी त्या मुलाला त्यावेळी पैशांचा हिशोब विचारला नव्हता.. परत काही पैसे येणार आहेत हे माझ्या ध्यानी मनी पण नव्हते..दिवसभराच्या धबडग्यामध्ये हे असले काही मनात पण नव्हते.. पण त्या मुलाचे मात्र मला मनापासून कौतुक वाटले.. मी मुद्दाम त्याचे नाव विचारले. सौरभ परदेशी हा इयत्ता ७ वीत शिकणारा मुलगा.. गरीब कुटुंबातून आला असला तरी या प्रसंगातून त्याचा प्रामाणिकपणा दिसून आला.. पैशापलीकडे काही असते आणि तेच महत्वाचे हा संस्कार निदान लहानपणी तरी त्याच्या मनावर कोरला गेला होता..
...................................................................................................................................................................
ते दोन रुपये मी आजही जपून ठेवले आहेत...!!
अजून सारेच संपले नाही हा दिलासा ते दोन रुपये मला देतात..!!!

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

देवदूत....!

कुलकर्णी नावाचं एक वृद्ध जोडपं आमच्या सोसायटी मध्ये आहे.. त्यांना मुल बाळ कुणीच नाही.. काही दिवसांपासून कुलकर्णी आजींना बरा वाटत नव्हतं.. त्या खूप थकलेल्या वाटत होत्या.. विचारलं तर आजकाल जेवणच जात नाही असा म्हणत होत्या.. हो नाई म्हणत एक दिवस डॉक्टर कडे गेल्या तर तपासणी मध्ये पोटात एक विचित्र असा मासाचा गोळा तयार झालं होता.. तो काढून टाकावा असे डॉक्टरनी सुचवले.. पण पुढची धावाधाव करायची तर घरात कुणीच हक्काचं नाही.. आजोबांचे वय ८० तर आजी ७५ च्या... आता करायचे काय हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता.. कुणाकडे मदत मागणार आणि इतका वेळ तरी आहे कुणाकडे??... आजीनी काही दिवस तसेच काढले.. पण दुखणं वाढत चाललेलं... अखेर जवळच राहणाऱ्या नलावडे यांनी त्यांना त्यांच्या मुलाकडे उपचार घेण्यास सांगितले. सुरवातीला नाव प्रतिथयश नसल्याने त्या थोड्या द्विधा मनस्थितीत होत्या पण पुढे त्यांनी तिथे उपचार घायचा निर्णय घेतला.. उपचार सुरु झाले.. शस्त्रक्रिया यशस्वी झाली.. पोटातील तो अनावश्यक भागही काढून टाकला पण हॉस्पिटल हे दुसरे घरच वाटावे इतकी अनपेक्षित आत्मीयता आणि आस्था तिथे अनुभवायला आली... कारण एकच होते डॉक्टरनि सर्वाना सांगितले होते कि उपचारासाठी आलेली माझी आई आहे..!! तेव्हा तिची सर्वांनी मनापासून काळजी घायची... उपचार सुरु झाल्यापासून डॉक्टर नियमितपणे यायचा. आजीच्या पाठीवरून प्रेमाने हाथ फिरून विचारायचा... आई, बरा वाटतंय ना?.. लवकर जायचं आपल्याला घरी...!! रुग्न्यालयात नर्स मोकळे पणाने चौकशी करत होत्या. वेळोवेळी होणार्या तपासण्या, चेक अप या वेळी त्यांना सारेच जण आपुलकीने वागवत होते.. पुण्यात अन्य कोणत्याही रुग्णालयात सहजासहजी येणार नाही असा अनुभव त्यांना तिथे येत होता .. अर्थातच उपचाराला प्रतिसाद देत आजी लवकर बर्या झाल्या.. डॉक्टर खरोखर मुलासारखा वागला.. बर्या झालेल्या आजीना घरी सोडायला आला.. पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निरोप घेऊन गेला.. स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात, माणूस माणसाला आणि माणुसकीला पारखा होत असताना हे उदाहरण फारच वेगळे वाटते ना...!!! प्रत्येक वृधामध्ये आपले आई वडील दिसले तर त्यांचा जगणं आणि दुखणं किती सुखी होईल ना...!!!

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

माझा दोस्त...!!



दोस्त या शब्दाला जो आवेग आहे.. तो इतर कुठल्याही समानअर्थी शब्दात येऊ शकत नाही... पण या शब्दाचा अर्थ अगदी मनापासून येऊन भिडला तो आज.. तो माझ्या जवळ आला.. अगदी निरागस हसला.. आणि मला घट्ट मिठी मारली... दोन सेकंद काय होतंय हे समजण्यासाठी गेले... पण मी त्याच्या मिठीतली निरागस, निस्वार्थ उब मी अनुभवली.. आणि एक निराळा निशब्द संवाद सुरु झाला... समाजाच्या दृष्टीने 'तो' मतीमंद... ते उपेक्षित आहेत याची आपल्याच मनाशी समजूत काढण्यासाठी दिलेला आणि एक शब्द म्हणजे विशेष... ती विशेष आहेत याचा छुपा अर्थ आमच्याबरोबरची नाहीत असाच...!!.. रूढार्थाने अंगवळणी पडलेले हे शब्द का कोण जाणे मला अजिबात वापरावेसे वाटत नव्हते.. पण आज त्या मिठीने मला अगदी जवळचा शब्द मिळून दिला... दोस्त...!
कामयानी या संस्थेत अशा काही दोस्तासमावेत मैत्रीदिन साजरा करावा अशी एक कल्पना पुढे आली आणि सार्यांनीच उचलून धरली.. त्या मुलांना आवडेल असे काहीतरी घ्यावे म्हणून काही काही घेऊन गेलो..मी, दीपा, धनश्री, राहुल, हीना, प्रिया, दीपक, पाध्ये असे सारेजण दुपारी कामायनी मध्ये गेलो... शाळा एव्हाना सुटायची वेळ जवळ आली होती.. त्यांचे एक शिक्षक आम्हाला एका वर्गात घेऊन गेले तिथे केस पिकलेली पण मानाने मुलच असणारी मुले गणवेश घालून काम करण्यात गुंग झाली होती... हे कोण पाहुणे आले अशा काहीशा नजरेने ते आमच्याकडे पाहत होते.. अवघ्या ५ मिनिटात १०० हून अधिक दोस्त जमा झाले.. आता काय याची उत्सुकता प्रत्येक मुलांच्या नजरेय होती... अनेकांच्या हातात अगोदरपासुनच मैत्रीचे धागे होते पण नवे दोस्त मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून अक्षरशः ओसंडून वाहत होतं... सारी मुले गोल रिंगण करून उभी राहिली आणि मध्ये आम्ही...!! इतरापेक्षा आपण वेगळे आहोत असं म्हटल्यावर की वाटत असेल याची जणू ती झलकच होती.. पण आम्ही स्वताला सावरलं आणि त्या मुलामध्ये रमायचा प्रयत्न करू लागलो.. पण खरं संग्याचा तर आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हि जाणीव सुप्तपणे आतून टोचत होतीच त्यामुळे सुरवातीला ते मिसळणहि नैसर्गिक नव्हतं... पण वातावरण त्याच मुलांनी मोकळं केलं... अगदी सहजतेने दादा, ताई, मावशी, काका अशा हाक सुरु झाल्या... त्यांच्या कोवळ्या हातात धागे बंधू लागलो तसा त्यांच्या चेहर्यावरचा आनंद लपेना... हातात हात घेऊन, निरागस हसत ते आपले भाव व्यक्त करत होते... ''माझं नाव प्रदीप.. तुझं??'' असं अगदी हक्काने विचारत होते... आम्ही सुरवातीपासून जपलेले एक हाताचे अंतर त्यांनीच एका क्षणात कमी केले होते... आवडलेल्या प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवून दिलखुलास दाद देत होते..
हे सगळे सुरु असतानाच मुलांमधल्या गर्दीतून वाट काढत तो माझ्याजवळ आला... शब्दांची जुळवाजुळव करून मी काही बोलू पाहणार इतक्यात तो हसत न बोलता माझ्या मिठीत शिरला... वयाने मोठा परंतु तरीही निरागसतेच अमृत जपलेल्या त्याला मिठीत घेतलं आणि पाठीवरून हात फिरवला तेव्हा मला माझ्या दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेतल्याची उब जाणवली... शब्दाविना स्पर्श खूप काही बोलून जातो तो असा...!!!
पुन्हा नक्की भेटण्याचे आश्वासन देत आम्ही निघालो पण हि सारी मुले मनातून काही केल्या जाईनात. बाहेर आलो तेच प्रत्येक जण आतून शांत होता... काहीतरी दिलं म्हणण्यापेक्षा स्वतःलाच काहीतरी गवसला होत.. खूप काही करता येण्यासारखं आहे... खूप काही करूयात.. असे निर्धारही झाले.. पण मनातल्या कोरड्या ठाक पडत चाललेल्या जमिनीवर या मुलांनी निशब्दपणे पाणी शिंपडले.. आणि आशेचा नवा अंकुर मात्र मनात रुजला ... निरागसतेने मैत्रीचा हात पुढे केला होतां आता तितक्याच जिंदादिलपणाने त्याला प्रतिसाद देणं आमच्या हाती होत...
या दोस्ताना आनंदाचे काही क्षण देण्यासाठी म्हणून आम्ही गेलो खरे पण त्यांनीच आम्हाला आनंदाची ठेव दिली... !!
त्यांच्याहि आठवणीच्या कप्प्यात आम्हाला एक 'विशेष' जागा मिळेल??.. नक्कीच...!!!!

शनिवार, ९ जुलै, २०११


'सहावा' दरवाजा बंदच राहू द्या..
पद्मनाभ मंदिरामध्ये १ लाख कोटी रुपयांची संपत्ती सापडली हि बातमी गेल्या आठवड्यापासून गाजते आहे.. सत्य साईबाबा तुलनेत अगदीच गर्रीब बिच्चारा वाटावेत इतकी प्रचंड संपत्ती या एकाच ठिकाणी सापडलेली आहे...
सत्य साईबाबांच्या संपत्तीचे नवनवे आकडे समोर येत असताना, केरळमधील तिरुवनंतपुरम येथे असलेल्या पुरातन पद्मनाभस्वामी मंदिराची संपत्ती त्यावर कडी करेल, असे दिसत आहे. या संपत्तीची मोजदाद सुरू असून ती किमान एक लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

योगनिदेच्या रूपात असलेल्या विष्णुचे हे मंदिर फार पुरातन असे मंदिर आहे... सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी महत्त्वाचे स्थान म्हणून या मंदिराला महत्वाचे मानले जाते.. अठराव्या शतकापर्यंत त्याचा जीणोर्द्धारहि करण्यात आलं होतं...
या मंदिरात असलेल्या संपत्तीची सुरक्षा करण्यास मंदिर समर्थ नाही. त्यामुळे या मंदिराच्या कारभाराची जबाबदारी सरकारने घ्यावी,' अशी जनहित याचिका टी. पी. सुंदरराजन या स्थानिक वकिलाने केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पद्मनाभ मंदिरातील सहा बंदिस्त खोल्यांचे दरवाजे उघडून संपत्तीची मोजदाद करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मंदिराचे एक एक दरवाजे उघडून त्यातील संपत्तीची मोजदाद करण्याचे काम सुरु झाले... केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश एम. एन. कृष्णन यांची मोजदाद समिती नेमण्यात आली असून या समितीने मोजदाद सुरु केली... या मंदिराचा कारभार अजूनही त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच आहे.

कुबेराची संपत्ती....!!!
* सोन्याचे तीन मुकुट, सोन्याने आणि रत्नांनी मढवलेल्या सहा पट्ट्या, सोन्याचे हिरेजडित पंधरा फुटी हार (प्रत्येक हार दहा किलो वजनाचा), सोन्यात घडवलेल्या देवांच्या मूर्ती, चार फूट उंचीची सोन्याची हिरेजडित विष्णुमूर्ती, सोन्या-चांदीची असंख्य नाणी, महागडी भांडी, हिरे-माणिक-मोती अशी संपत्ती आतापर्यंत सापडली आहे.
* पाच हजार कोटींच्या संपत्तीची मोजदाद पूर्ण झाली. एकंदर संपत्ती एक लाख कोटी रुपयांची (२२.३ अब्ज डॉलर) असल्याचा अंदाज. त्यापैकी पन्नास हजार कोटी रुपयांचे दागिनेच असल्याचा आडाखा.
* गेले दोन दिवस सुरू असलेली मोजदाद पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता. १८८० मध्ये या मंदिराच्या दोन खोल्या उघडल्या होत्या, त्यावेळी कोट्यवधींची संपत्ती सापडली होती. ही संपत्ती जमिनीच्या खाली वीस फूट खोल लपवली होती.

त्रावणकोरच्या महाराजांची संपत्ती शत्रूपासून लपविण्यासाठी मंदिरात भुयार करून तेथील खोल्यांमध्ये शाही खजिना दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी लपवण्यात आला असावा.
जरा करूया तुलना...
* देशाचे बजेट : १२,५७,७२९ कोटी रुपये
* आरोग्यासाठीची तरतूद : २६,७६० कोटी रुपये
* शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद : ५२,०५० कोटी रुपये
* भारतावरील कर्ज : सुमारे १५ लाख कोटी रुपये (२०१०-११)
* महाराष्ट्राचे बजेट : ७,६५४ कोटी रुपये (२०१०)
* मुकेश अंबानींची संपत्ती : १,३५,००० कोटी रुपये
हा सगळा झाला आजवरच्या घडामोडींचा निव्वळ आलेख... खरं मुद्दा या पुढेच आहे... या पद्मनाभ मंदिराचा सहावा दरवाजा उघडावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत... आत्तापर्यंत जितकी संपत्ती सापडली आहे त्यापेक्षाही अधिक संपत्ती या सहाव्या दरवाज्याच्या आड लपलेली आहे असं अनेकांचा कयास आहे... पलीकडे संपूर्ण सोन्याने भरलेली नाव, सोनेभरून राहिलेल्या विटा ब त्याने भरलेल्या विहिरी आणि अजून कित्येक अंदाज बांधले जात आहेत... या दरवाज्यापलीकडे किमान ५ लाख कोटी पेक्षा अधिक संपत्ती असावी असं अनेकांचा अंदाज आहे... तर दुसर्या बाजूला काहीही झाले तरीही हा शेवटचा दरवाजा उघडू नये अशी राजघराण्याची, पुजार्यांची श्रद्धा आहे... सहाव्या दरवाज्यावर असणाऱ्या नागाच्या मूर्ती रक्षक असून त्यांना ओलांडणे शुभ नाही... इथपासून ते सहावा दरवाजा उघडला तर थेट समुद्रामध्ये जातो.. साम्द्राचे पाणी त्यात शिरून मंदिरच पाण्याखाली जाण्याची भीती आहे... मंदिराचा आधार सहाव्या दरवाजात आहे.. तो उघडल्यास तो आधारच नाहीसा होऊन मंदिर कोसळू शकते अशी भीती वर्तवली जात आहे...

परंतु घटना, घडामोडी, परिस्थिती, अंदाज या सर्वांच्या पलीकडे जाऊन या पद्मनाभ मंदिराच्या घटनेकडे पाहायचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते... या मंदिराची घटना आपल्याला काही सांगू तर पाहत नाही ना... थोडासा थांबून याचा विचार व्हायला हवा असे वाटते... समाजात विविध स्तरावर निर्माण झालेल्या बजबजपुरीमध्ये पद्मनाभ मंदिराची घटना खूप काही सांगून जाणारी आहे.. त्यातून आपण काही बोध घेतो का हे मात्र फार महत्वाचे आहे...

समाजात अशांतता, अस्वस्थता भरून वाहत असताना.. एका आकस्मिक संधीच्या रूपाने पद्मनाभ मंदिरातील संपत्ती उघड झाली.. इतकेच नव्हे कुणी कल्पनाही केली नसेल इतकी म्हणजे १ लाख कोटी रुपये... इतकी प्रचंड संपत्ती दिली.. अर्थात निसर्गाने देतात्ना पुन्हा हाथ आखडता घेतला नाही... नेहमीसारखेच भरभरून दिले... पण इतके हाती येऊनही आम्हाला सहाव्या दरवाज्याची हाव सुटत नाही... पाच दरवाजे उघडून अमाप संपत्ती मिळूनही साधन नाही.. अजून हवेच... या हावरटपणाने सहावा दरवाजा उघडावा आणि अधिक संपत्ती मिळवावी हि सुप्त हाव दिसून येत आहे...!!

मला वाटतंय कि तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच जीवनात अनेक पावलावर हा सहावा दरवाजा येत असतो.. कुठे थांबायचे हे आपल्या आयुष्यात आपल्याला समजले कि पुढची फरफट थांबत असते.. आज नेमके हेच समाजात नसल्याने आपण सारेच नुसते मिळवण्यासाठी धावत आहोत.. पण समाधान कोणत्याच पातळीवर होताना दिसत नाही.. पद, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, या सार्याच्या मागे बेभान होऊन धावतो.. मिळू लागले कि समाधानाची वृत्तीच गायब होते आणि मग आणखी हवे चा एक वाईट हव्यास सुरु होतो... अपेक्षा बाळगणं वाईट नाही पण दिशा विसरून अपेक्षान्मागे पळत राहणं खरच चुकीचा आहे... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सध्या एक नवा सहावा दरवाजा आपल्याला ठोठावतो आणि स्वताकडे या ना त्या प्रकाराने आकर्षित करतो.. पण आपण तिकडे जायचे कि समाधानी वृत्ती बाळगून आनंदी राहायचे हे अखेर आपल्याच हाती असते...

तेव्हा त्या पद्मनाभ मंदिरातील संपत्तीचे काय व्हायचे ते होवो पण आपल्या मनातील असंतुष्टपानाचा, असमाधानाचा, असंतोषाचा, अविवेकाचा... हा सहावा दरवाजा आपण बंदच ठेऊया.. मला वाटतं पद्मनाभ मंदिरातील घटनेचा यापेक्षा सुंदर बोध असू शकत नाही...

पराग पोतदार

शनिवार, २५ जून, २०११

एवढंसं आभाळ...!



घराशेजारी उभं राहत असलेलं एक घर... त्या घराच्या भिंती उभ्या राहताना त्याची देखभाल करण्यासाठी पत्र्याची झोपडी उभारून अनेक महिन्यापासून आमचे शेजारी बनून राहिलेलं एक कुटुंब! आई, वडील आणि दोन चिमुकली भावंड. जेमतेम ८ बाय १० मध्ये उभारलेला संसार..
घरभर... रस्त्यावर दिवसभर फिरणारी त्याची चिमुकली पावले.. पायरीपाशी पसरलेल्या रेतीमध्ये दिवसभर मनसोक्त खेळणं... आसपासच्या बंगल्यातली पोर खेळण्यांशी कशी खेळतात हे गेटवर उभं राहून पाहत राहणं... रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यामागे उगीचच पळत राहणं.. काळ्या पडून स्वतःचा रंग हरवून बसलेल्या बशीत काहीतरी खाणं... लाकडं तोडणार्या बापाच्या मागे पुढे उगीच घोटाळत राहणं.... हातगाडीवर विकायला येणाऱ्या वस्तूंकडे आशाळभूतपणे पाहत राहणं.... आणि चुकून आई किंवा बाप मेहेरबान झालाच तर स्वर्गीय आनंद देणारी कुल्फी अगर गार गार बर्फाचा गोळा अंगभर पसरेपर्यंत खात राहणं... दिवसभर हुंदडून दमल्यावर जमिनीवरच पसरलेल्या टोचणार्या चादरीवर शांत झोपूनही जाण...
या सगळ्या बालविश्वामध्ये सर्वात जिवाभावाची आणि नेहमी सोबत असणारी एक पाय मोडलेली खेळण्यातली सायकल. झोपतानाही शेजारीच पहुडलेली असायची... मित्र नव्हतेच पण त्या सायकल बरोबर काही वेगळे नाते जुळलेले असावे...
परवा सोसायटीमध्ये भंगारवाला आला... नेहमी येतो तोच... रोज दिसणाऱ्या या छोट्या कडे पाहत तो गमतीने म्हणाला, काय रे, नेऊ का तुझी हि सायकल..??''
एकदम कुणीतरी गळा पकडावा तसं अस्वस्थ होत त्याने सायकल मागे घेतली आणि काही झाले तरी सायकल मिळणार नाही हा निर्धार कृतीतूनच सांगितला.. भंगारवाला नजरेआड होईपर्यंत मुलाने त्याह्च्यावरून नजर हळू दिली नाही आणि सायकलवरची पकडही तितकीच घट्ट ठेवली होती... पुढच्या वळणावर जाऊन भंगारवाला परत आला... भंगारवाल्याचा आवाज ऐकून झोपडीतून त्या मुलाची आई बाहेर आली... मुलाचं लक्ष नाही हे पाहून तीच सायकल समोर एका हातात उचलून धरत म्हणाली, '' किती देणार याचे?'' १५ कि २० रुपये यावर थोडीशी घासाघीसही झाली.. अखेर २० नक्की ठरले आणि ती सायकल भंगाराच्या गाडीवर ठेवली गेली... तो छोटं मुलगा मात्र कोपर्यात उभं राहून हे सारं पाहत होता.. डोळ्यामध्ये प्रचंड काकुळता आणि कारुण्य दाटले होते.. आईसमोर जाऊन भांडून, रडून का होईना सायकल परत मिळवावी असे वाटत होते पण यातले त्याने काहीच केले नाही.. आश्चर्यही वाटले आणि वाईटही... मगाशी गमतीने भंगारवाला जे म्हणत होता ते आता खरेच घडत होते या सगळ्याचा किती गोंधळ त्या कोवळ्या मनात उठला असेल हे समजायला मार्ग नव्हतं... आईच्या हातावर २० रुपयांची नोट टेकवून भंगारवाल्याने गाडी पुढे घेतली... दारामागे लपून पाहणारी चिमुकली पावले मला उगीचच थरथरल्यासारखी भासली... आईचा धाक होता कि काय माहीत नाही पण आई फिरून झोपडीत शिरेपर्यंत ते पोरगं काही बाहेर आलं नाही. आईची पाठ फिरल्यावर मात्र गाडीवरची नजर हलू ना देता वेगात बाहेर आलं... आणि भंगाराची गाडी पुढे जात असताना हताशपणे पाहत उभं राहिला होतं... भंगारवाला निघून गेला.. छोट्याशा तळहातानी स्वताचेच डोळे पुसले असल्याचा मला लांबून भास झाला...
जमिनीवरच अंथरलेल्या त्या चादरीवर त्या चिमुकल्याला रात्री झोप लागली असेल का हा प्रश्न माझ्या मनात अनुत्तरीतच राहिला....