तुला शाळेत घालायचे याची तयारी आम्ही किती दिवसांपासून करतोय..
तू शाळेत पहिलं पाऊल टाकणार हा आमच्यासाठी किती आनंदाचा क्षण..
कालपर्यंत तू घर भर आनंदाचे माणिकमोती पसरत होतास
आता जगाच्या आकाशाखाली पहिल्यांदा उभं राहून स्वतासाठी पहिलं पाऊल टाकणार..
किती आवडीने सगळी तयारी करत होतो रे
तुझ्यासाठी तुला आवडेल असं छानस छोटं दप्तर आणलं..
तुझ्या चीमुल्कल्या बोटात मावतील असे रंगीत खडू आणले..
तुझा शाळेचा ड्रेस आणला... तुझ्या आईने तुझ्या सार्या वह्या-पुस्तकांना कव्हर घातली..
तुझ्या दप्तरावर आणि तुझ्या ओळखपत्रावर तुझा छोटुसा फोटो लावताना किती छान वाटत होत..
तू शाळेच्या पहिल्या दिवशी घाबरू नयेस.. रडू नयेस.. म्हणून किती धडपड..
रोज गाडीवर बाहेर पडल्यावर तुला तू ज्या शाळेत जाणार ती शाळा दाखवत होतो..
भिंतीवर रंगवलेले जिराफ आणि फुलं दाखवून तुझ्या मनात शाळेची गोडी निर्माण करायचा प्रयत्न करत होतो..
शाळेत गेलं कि रडायचं नाही हे तुझ्या कोवळ्या मनाला सारखं बजावत होतो...
शाळेत इतर मुलं रडली तर त्यांना तूच समजवायचं असं मोठेपणहि कारण नसताना लादत होतो..
तू पण म्हणालास...
''मी शान्गेन बाबा शगल्याना.... ललू नका.. मी आहे न.. मी गाने म्हनून दाखवेन ना...''
इतके गोड वाटत होते तुझे बोल...
आणि शाळेचा तो पहिला दिवस उगवला..
तुला छान तयार केलं.. शाळेचा घडी न मोडलेला ड्रेस तुला घातला..
तुही सारे कसे मजेने करत होतास..
हसत होतास..
शाळेच्या दारात पोचलो.. आणि अगणित चिमुकल्यांचा एकच रडण्याचा आवाज कानावर आदळला..
तुझी माझ्या मानेभोवाताल्ची मिठी नकळत घट्ट झाली..!!
तुला मला सोडायच नव्हतं
आणि मला, 'हसत हसत' तू शाळेत जाताना पाहायचं होतं...
गेट मधून आत आलो आणि वर्गा वर्गात मुलं नुसती कोंबली जात होती..
आई वडिलांच्या हातातून घेऊन त्यांना आत घेतल्या घेतल्या दार लावलं जात होतं.
आतून फक्त हमसून हमसून रडण्याचा आवाज...!!!
तुला मी पण तसंच सोडणार होतो रे ..
मला तसं सोडायचं नव्हतं तरीही..
मी तुला दोन मजले चढून एका वरच्या खोलीत घेऊन गेलो..
तिथून पण असाच नुसता आक्रोश ऐकू येत होता..
रडू नको हा असं तुझ्या आणि नकळत माझ्या मनालाहि समजावत मी वर्गापर्यंत आलो..
आतून कडी लावलेली होती...
मी दार जोरात वाजवल..
किलकिलं होत दार उघडलं...
भसकन एखादा आगीचा लोळ यावा तसा चिमुरड्यांच्या प्रचंड रडण्याचा आवाज कानावर आदळला..
मी काही बोलणार इतक्यात आतून दोन हात आले आणि चेहराही नीट दिसू न देता माझ्या मुलाला आत घेऊन गेले..
मी सुन्न...!!!
दार बंद होताना त्या निरागस मनाची एक ओझरती दृष्टीभेट झाली.. त्याच्या डोळ्यात क्षणात किती पाणी तरळले होते..
असहाय्यता, हतबलता, भीती, कारुण्य.. आणि कितीतरी खोल होते त्या दोन चिमुकल्या डोळ्यात..
माझा श्वास अडकला... मी त्या नजरेला नजर देऊ शकलो नाही..
एका क्षणाच्या अंतरात दरवाजा बंद झाला...
मी काही क्षण तिथेच दरवाजाबाहेर उभा..
रडणाऱ्या त्या कोवळ्या जीवांमध्ये मी माझ्या पिल्लालाही सोडून आलो होतो..
त्या कोलाहलात आता मी माझ्या चिमुकल्याचा आवाज ऐकू पाहत होतो..
बंद दरवाजे.. बंद खिडक्या आणि तिथल्या बंद मनांना चिरून हजारो रडणारे आवाज माझ्या कानावर आदळत होते..
आता ते सारे आवाज मला माझ्याच पिल्लाचे वाटत होते...
मी यांत्रिकपणे पायर्या उतरून खाली आलो.. अजून मुलांचे रडणे काही थांबत नव्हते..
मुलांसाठी शाळेत बरेच फुगे लावले होते.. दारासमोर रांगोळी काढली होती..
पण मला ते सारे रंग केविलवाणे आणि कृत्रिम वाटत होते..
कारण निरागसपण आतून धाय मोकलून रडत होते...!!!
तीन दिवस रडतात पोर.. नंतर रुळतात...
तोंडातून लाल रस बाहेर काढत गेट बंद करताना कुणीतरी म्हणाला..
साडेदहा शिवाय येऊ नका असं आई बापाला हाकलत तो निवांत गप्पा मारत बसला..
मुलांचे रडण्याचे आवाज त्याला नित्याचे असावेत..
रस्त्यावरून धावणाऱ्या असंख्य गाड्याचे आवाज कुणी लक्ष देऊन ऐकतो का.. तसेच हे रडणे कि..
अर्धा तास होत आला मी अजून गेट बाहेरच उभा..
मी का सोडलं मुलाला शाळेत..??
त्याच आनंदाचं जग असं हिरावून काही क्षण तरी त्या कोंडवाड्यात डांबण्याचा अधिकार मला कुणी दिला.. ??
किती स्वप्नं दाखवली त्याला आणि फसवून कुठ सोडून आलो त्याला..??
त्या कोलाहलात किती भांबावून गेला असेल बिच्चारा...
कंठ दाटून आलेला...
अरे अशी कुठे असते का शाळा.. ??? न राहवून मी बोललो.. आवाज पण कातर झालेला..
माझ्या पिल्लाचे आजी-आजोबा किती कौतुकाने आले होते शाळेत...
दोघांचे पाय दुखत असूनही...
वेळेत पोचले नाहीत म्हणून त्यांना त्याला वर्गात जाताना पाहता आले नाही..
त्यांनी नाही पहिले ते बरेच झाले.. नाही तरी होते काय पाहण्यासारखे त्यात..!!
खालच्या वर्गातील एक खिडकी अचानक उघडली..
अश्रुनी डबडबलेले दोन डोळे आणि मदतीसाठी बाहेर आलेले दोन हात मला दिसले..
क्षणात खिडकी बंद झाली आणि खिडकीचा पडदाहि बंद झाला..
हे काय होते.. किती भयानक.. किती अमानुष..??
खरच अशी असते का हो कुठे शाळा..?
घड्याळाचा कसोटी पाहणारा काटा अखेर साडेदहा वर पोचला..
मग शाळा सोडायची का याची परवानगी घ्यायला शिपाई गेला..
करकरत पुन्हा गेट उघडले आणि इतका वेळ रोखून धरलेली मने त्या निरागस जिवाकडे धावली..
मी पुन्हा दरवाजासमोर उभा... गेलेला दीड तास डोळ्यासमोरून गेला..
रडणारा तो चिमुकला चेहरा आठवला..
दरवाजा बंद होतानाचे त्याचे भरून आलेले डोळे आठवले..
दरवाजा उघडला पण एकदम सगळ्यांना सोडेनात..
दरवाजाच्या कोपर्यात उभा राहून पाहणाऱ्या पिल्लाला अखेर मी दिसलो..
माझ्याजवळ यायची तो केविलवाणी धडपड तो करत होता..
अखेर मी त्याच्या जवळ गेलो त्याला उचलून घेतला..
पुन्हा त्याच बांध फुटला.. मानेवर डोकं ठेऊन रडत राहिला..
त्याच्या अश्रुनी मी पुरता भिजून गेलो.. पार आतूनही...!!!
संपली रे बाळा, शाळा.. असं समजावत त्याला बाहेर आणलं
आईच्या जवळ गेला आणि पुन्हा त्याला रडूच फुटलं...
खिशात कोंबलेला एक बिस्किटचा पुडा होता पण त्याला हातही लावलेला दिसत नव्हता...
शाळा आवडली का रे.. ?? माझा एक फालतू प्रश्न...
''नाही आवडली..'' अपेक्षित उत्तर..
हळू हळू शांत झाल्यावर तो मला म्हणाला..
बाबा, तू मला आत सोडून दार का लावून घेतलं??
मी खूप रडलो.. तुला शोधात होतो मी..
मला अक्षरशा भडभडून आलं..
मी त्याला जवळ घेऊन म्हटलं
मी नाही रे लावलं दार.. ते चुकून लागलं.. मी बाहेरच उभा होतो.. दार दुरुस्त केलं आणि मग उघडलं..
तो म्हणाला... बाबा असं जाऊ नको रे मला सोडून..!!
माझ्याकडे उत्तर नव्हतं...
मी त्याला जवळ घेतला.. पाठीवर झोपवून थोपटलं...
रडून रडून थकलेला तो जीव शांतपणे, विश्वासाने पडून राहिला होता..
शाळेचा पहिला दिवस खरच असं असावा..?
किती स्वप्नं दाखवली होती मी आणि किती भ्रमनिरास झाला असेल त्याचा...
माझ्या हातातून अचानक अनोळखी हातात जाताना तो किती बावरला असेल?
खोलीत सारे अनोळखी जग पाहताना किती वेळा काळजाचा ठोका चुकला असेल?
आई बाबाला सोडून पहिल्यांदा बंद खोलीत ते सारे रडणे अनुभवताना मनात किती बावरला असेल?
चटकन जाऊन बिलगावे अशी जागाच न सापडल्याने किती सैर भैर झाला असेल?..
आतल्या खोलीत कितीही मोठ्या आवाजात कार्टून लावले म्हणून काय त्याचे लक्ष वेधू शकले असेल?
अजिबात नाही...
मग या कोवळ्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस खरच कधी आनंददायी करता येणार नाही का आपल्याला.??
मुलं हळू हळू रुळतात हे मान्य पण ती जुळवून घेतात.. आपण म्हणतो रमली पोर..
पण इतक्या लहान वयात हि अशीच सुरवात करायला हवी?? दुसरे काहीच पर्याय नाहीत? कि आपल्याला याचा विचार करावासाच वाटत नाही इतके आपण असंवेदनशील बनत चाललो आहोत?..
चार भिंतीतून पहिल्यांदा त्यांना बाहेर काढायला हवे..
सहवास, नवी माणसे छान असतात हे त्यांना उमगू द्यावे..
मुलं मुलामध्ये रमतील ना, पण अशी दारं खिडक्या लावून नको..
निसर्गा च्या सोबतीने वर्ग सुरु नाही का करता येणार?
अनोळखी हातात एकदम जाताना ते हात ओळखीचे करून मग नाही का देता येणार?
खूप नाही बदलावे लागणार.. फक्त थोडी संवेदनशीलता जागवावी लागेल.
चिमुकल्यांच्या मनात शिरून त्यांना काय हवं ते जरा समजून घ्यावं लागेल..
या घडीला मात्र... मी आणि माझ्या पिल्लामधील ती दृश्य-अदृश्य भिंत अजूनही तशीच आहे..
अन डबडबलेल्या डोळ्यांनी तो मला विचारतोय...
बाबा, तू दार का लावलं रे..??
मला नको असं सोडून जाऊ.....!!!!